6, Mar 2025
मराठी पुस्तक समीक्षा- छावा | Marathi Book Review – Chavaa.

 

पुस्तक परिचय –

पुस्तकाचे नाव – छावा
लेखक – शिवाजी सावंत
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या- 877

 

                      नमस्कार वाचक मित्रहो, ही माझी Book Review या Blog Post च्या मालिकेतील पहिलीच Post आहे. आजची ही Post सध्या चर्चेत असलेल्या विषयावर म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेल्या पुस्तकाविषयी आहे. आशा आहे की ही पोस्ट आपणास नक्की आवडेल.

“छावा”. मराठीमध्ये सिंहाच्या बछड्यास छावा असेच म्हटले जाते. लेखक शिवाजी सावंत यांनी अतिशय समर्पक असे नाव त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेल्या या पुस्तकास दिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण ते औरंगजेबाच्या कैदेतील शेवटच्या दिवसापर्यंतचा महाराजांच्या जीवनातील संघर्ष लेखक शिवाजी सावंत यांनी त्यांच्या लेखन शैलीने जिवंत केलेला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचे बालपण खडतर असेच होते. वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या च वर्षी महाराणी ”सईबाई” यांचे निधन झालेले. त्यामुळे आईच्या मायेला पारखे झालेले महाराज ‘धाराऊ’ यांच्या छायेखाली वाढले. संभाजी महाराज हे लहानपणापासून युद्ध कलेचे धडे घेत होते सोबतच काव्यरचनेतही रस घेत होते. महाराजांनी पुढे जाऊन तलवार गाजवली तसेच त्यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून काव्यरचनाही केली. त्यांनी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला आहे. त्यांचे जीवन सतत संघर्षमय राहिलेले आहे. वयाच्या नवव्या वर्षीच दिल्लीमध्ये औरंगजेबाच्या छावणीत ओलिस रहावे लागले होते. पुढे जाऊन शिवाजी महाराज व संभाजी महाराज या पिता पुत्रातील संबंध काही प्रमाणात ताणलेले दाखवले आहेत. यातूनच त्यांना काही काळ पन्हाळगडावर नजर कैदेतही ठेवण्यात आले होते.
                             1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर चहुबाजूने शत्रूंनी आक्रमण केले होते. या काळात स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या शिरावर घेतली. सिद्धी, फिरंगी, इंग्रज सोबतच स्वराज्य बेचिराख करण्याच्या हेतूने तीस लाखांची फौज व 14 कोटींचा खुर्दा घेऊन दक्षिणेत उतरलेला औरंगजेब. या सर्वांना निकराचा लढा देत असलेले संभाजी महाराज. या संघर्षमय कालखंडात खंबीर नि तेवढाच हळवा पाठिंबा असलेल्या महाराणी येसूबाई. औरंगजेबाच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर देत असतानाच जवळच्यांनी केलेल्या फंदफितुरीने औरंगजेबाच्या कैदेत अडकलेला छावा. यावेळी सोबत असलेला सखा म्हणजेच कवी मित्र कविकुलेश. या दोघांच्या निखळ मैत्रीचा प्रत्ययही या कादंबरीत ठीक ठिकाणी येतो. औरंगजेबाच्या कैदेतील शेवटच्या दिवसांचे वर्णन मनाला चटका लावणारे आहे. तसेच औरंगजेब व छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील संवाद अतिशय प्रभावी आहेत. सदर कादंबरी लेखनासाठी लेखक शिवाजी सावंत यांनी ऐतिहासिक स्थळ काळाचा विस्तृत अभ्यास केलेला आहे. विविध शिव- शंभूकालीन ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन तसेच ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करून हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे.
                         एकंदरीत 877 पानांचा प्रचंड आवका असलेली कादंबरी वाचताना कुठेच मन विचलित होत नाही. कादंबरीत तयार केलेले वातावरण आणि संवाद लेखन आपल्याला थेट शिवकाळात घेऊन जाते. कादंबरी वाचून पूर्ण झाल्यानंतर मन सुन्न होतं. “छावा” प्रत्येक माणसाने वाचावे असे पुस्तक आहे. सर्वच जनमनांसाठी अतिशय प्रेरणादायी अशी ही कादंबरी आहे. जगातील कोणत्याच राजाने आपल्या मातीसाठी आपल्या धर्मासाठी असे सर्वोच्च बलिदान केलेले नाही. केवळ फंदफितुरीने छत्रपती संभाजी महाराज शत्रूच्या तावडीत सापडले अन्यथा हा छावा अजिंक्यच होता..म्हणूनच छावा ही कादंबरी मनात घर करून राहते…

 

पुस्तकासंदर्भात महत्वाचे:

  • छावा कादंबरी 28 एप्रिल 1979 रोजी प्रकाशित झाली. सदर कादंबरीचा प्रकाशन सोहळा किल्ले प्रतापगड,सातारा येथे पार पडला.
  • या कादंबरीवर आधारित नुकताच “छावा” हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला आहे तसेच यापूर्वी मराठी चित्रपटही.याआधी यावर नाटक ही प्रदर्शित झालेले आहे. तसेच झी मराठीवर झालेल्या मालिकेसाठीही या पुस्तकाचा संदर्भ घेण्यात आलेला आहे.
  • छावा या कादंबरीस 1980- 81 सालचा महाराष्ट्र शासनाचा मराठी वाड्मय निर्मिती पुरस्कार मिळालेला आहे.

ॲमेझॉन वरून पुस्तक विकत घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-https://amzn.in/d/0Z3aS9L

 

बुकगंगा या वेबसाईटवरून पुस्तक विकत घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-https://www.bookganga.com/R/531AC

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *